मनाचिये गुंती, गुंफियेला शेला …
ए खादी व्यक्ती का लिहिती होते? लिखाण करायला आवडते म्हणून? स्वतःचे मत व्यक्त करावेसे वाटून ते प्रत्यक्षात आणायचे म्हणून? आपल्या नावावर पुस्तक असावे म्हणून? लोकांना उपदेश करायचा म्हणून? काहीतरी नवीन सांगावे म्हणून? वेळ जात नाही म्हणून? … की आपण आपले लिहीत जावे, कोणाला आवडो अथवा न आवडो, कोणी कौतुक करो वा न करो, स्वान्तसुखाय लिहीत जावे, स्वतःचे विचार मोकळेपणी मांडत जावे…या भावना ठेवून? आपण लिहावे, घरच्यांनी वाचावे, मित्रमंडळींनी वाचावे, वाटलेच तर त्यांच्या मित्रपरिवाराने वाचावे आणि आपला विचार त्या लोकांपर्यंत पोचावा. त्यांना आनंद झाला तर ठीक, न झाला तरी ठीक, पण आपण प्रांजळपणे लिहीत जायचे , हलक्याफुलक्या शब्दांत, कधी प्रेमळपणे, कधी कठोर शब्दांत ….. यासाठी? हा शेवटचा विचार फार कमी लोक मनात आणतात. या थोड्या लोकांमध्ये सौ. मुग्धा मंदार फडके यांचे नाव येते. (विख्यात लेखक अंबरीश मिश्र यांच्या भाषेत मुग्धाबाई !) त्यांना भरपूर वेळ होता, म्हणून भरपूर लेखन करता आले, असे म्हणणे त्यांच्यावर अन्याय करण्यासारखे होईल. कारण निवेदिका, सूत्रसंचालिका (मराठी, हिंदी वाद्यवृंद, शास्त्रीय संगीताचे कार्यक्र...