सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे महत्व अधोरेखित
मुं बईतल्या ताज्या पावसाने दाणादाण उडविल्यावर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे महत्व अधिक अधोरेखित झाले आहे. रेल्वे, मेट्रो, ‘बेस्ट’ बस ही सार्वजनिक वाहतुकीची साधने आणि त्याबरोबर टॅक्सी, रिक्षा ही त्यांना अत्यंत पूरक पण खासगी मालकीची साधने यावर मुंबई ‘धावते’. मुंबईत जरा जास्त पाऊस पडला के त्या पाण्याचा निचरा होत नाही. परिणामी पूरसदृश परिस्थिती निर्माण होते हे आतापर्यंत अनेक वेळा सिद्ध झालेले आहे. नाल्यांची सफाई नीट होत नाही, शहरातला कचरा कमी होत नाही, ड्रेनेज यंत्रणा जुनी झाल्याने प्रश्न निर्माण होतात. यावर नुसती चर्चा होते. पुढच्या वर्षी परत तेच रडगाणे गायले जाते. त्यातच मुंबईला आडवी पसरायला जागा नसल्याने ती ‘उभी’ वाढत आहे. नवनवे तोवर उभे राहात आहेत. मुंबईत पाणी, वीज व इतर मूलभूत सुविधांवरचा ताण कमालीचा वाढत आहे, आणखी वाढणार आहे. अशा स्थितीत मुंबईकरांचे जीवन अधिक त्रासाचे होणार आहे यात शंका नाही. मुंबईत मेट्रो अलीकडच्या काळात आली, तोपर्यंत रेल्वे आणि रिक्षा, टॅक्सी यावरच सर्वसामान्य माणूस विसंबून होता. ज्यांच्याकडे स्वतःच्या गाड्या आहेत त्यांची गर्दी मुंबईला अधिकाधिक घुसमटवून टाकत आह...