बातमी, विश्लेषण आणि अर्थ सांगणारे पुस्तक
विख्यात पत्रकार राजीव साबडे यांनी लिहिलेले आणि ‘रोहन प्रकाशन’ने प्रसिद्ध केलेले ‘वार्तांच्या झाल्या कथा’ हे पुस्तक पत्रकार होऊ इच्छिणाऱ्या आणि काही वर्षे पत्रकारिता करणाऱ्या प्रत्येकाने वाचण्यासारखे आहे. ‘एका ज्येष्ठ पत्रकाराने अनुभवलेल्या विविध घटनांचे गोष्टीरूप चित्रण’ असे पुस्तकाच्या सुरुवातीला म्हटले असले तरीही वेगवेगळ्या घटनांचे रिपोर्ताज स्वरूपातले लेखन आणि ती घटना आज अनेक वर्षे होऊन गेली तरी डोळ्यासमोर जशीच्या तशी उभी करण्याचे कसब हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. हे संपूर्ण लेखन कधीही कोणताही सवंगपणा आणि भडकपणा येऊ न देता केले असल्यामुळे ते अधिक विश्वासार्ह वाटते. श्री साबडे यांची संपूर्ण कारकीर्द पुण्याच्या 'सकाळ' या वृत्तपत्रात गेली. तब्बल ३४ वर्षे विविध संपादकीय पदांवर त्यांनी काम केले आहे. त्यामुळे त्यांना देश-विदेशात वार्तांकन करण्याची संधी मिळाली आणि त्यातल्या काही घटनांवर त्यांनी हे पुस्तक लिहिले आहे. पुस्तकांमध्ये तेरा प्रकरणे आहेत आणि प्रत्येक प्रकरणातला तपशील हा स्वतंत्रपणे पुस्तक होऊ शकतो इतका भरगच्च आहे. या तेराही विषयांवर यापूर्वी कोणी लेखन केले नाही असे नाही,...